पुणे : कुणाचे तोंड आंब्याच्या रसाने माखले आहे, कुणाच्या हातावरून रस ओघळतो आहे, कुणी आंब्याची कोय सांभाळत खाण्याचा प्रयत्न करतेय.... नि आंबे खाण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे... हे दृश्य होते बालगंधर्व रंगमंदिरात अलीकडेच रंगलेल्या आंबे खाण्याच्या कार्यक्रमातील.
पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने वंचित, तसेच दिव्यांग मुले आणि आणि पोलीस काकांसाठी आंबे खाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मुलांसोबत आंबे खाण्याचा आनंद घेता आल्याबद्दल सहभागी पोलिसांनीदेखील समाधान व्यक्त केले.
‘यंदा या उपक्रमाचे आठवे वर्ष असून, या वेळी जमा झालेल्या सुमारे दोन हजार ५०० कोयी ग्रामीण भागात पेरण्यात येणार आहेत,’ असे आयोजकांनी सांगितले.